मुळशीत समस्या आ वासून उभ्या, बुळबुळीत आढावा नको, परिणामकारक बदल हवाय
पिरंगुट : खासदार सुप्रिया सुळे आज शनिवारी मुळशी दौऱ्यावर येत आहेत. पिरंगुट, ता.मुळशी येथील पुलाची पाहणी, अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान तसेच विविध विकासकामांचा आढावा या दौऱ्यात त्यांच्याकडून घेतला जाणार आहे.
गतवर्षी ४ जून
२०२४ रोजी लोकसभेचा निकाल लागल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे आतापर्यंत ३-४ वेळाच
ते पण अत्यल्प काळासाठी आणि प्रत्येक वेळी एकाच कामासाठी मुळशीत आल्या आहेत.
त्यामुळे नागरिकांनी अनेक मागण्या सोशल मीडियावर मांडल्या आहेत. मुळशी तालुक्यातील
समस्या सोडवण्यासाठी खासदारांनी सातत्याने प्रयत्न केले पाहिजेत, मात्र तसे होताना दिसत नाही. त्यामुळे
नागरिकांची ओरड होत आहे. नागरिक म्हणत आहेत की, मुळशीतील
समस्यांवर नुसता बुळबुळीत आढावा नकोय तर परिणामकारक बदल हवाय.
भुगावच्या प्रचंड ट्रॅफिकची रोजच समस्या
नागरिक म्हणतात, भुगावला रोज प्रचंड ट्रॅफिक होत आहे, ही समस्या सोडवली पाहिजे. खासदारांनी या
समस्येकडे लक्ष देऊन राष्ट्रीय महामार्ग असलेल्या पुणे-कोलाड रस्त्यावरील बाह्यवळण
मार्गाचा पाठपुरावा केंद्र तसेच राज्य सरकारकडे करावा. प्रचंड वाहतूक कोंडीने रोज
संध्याकाळी मुळशीत येणाऱ्या चाकरमान्यांना तसेच भुगाव, भुकूम व मुळशीकर नागरिकांना प्रचंड मानसिक व
शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे.
मुकाईवाडी ते उरवडे रस्त्यावरील खड्डयांनी त्रस्त
मुकाईवाडी ते
उरवडे या रस्त्यावर प्रचंड खड्डे आहेत. रस्त्याला निधी मिळाल्याचे म्हटले जातेय.
मात्र हा रस्ता लवकर आणि अधिक रुंद होण्याची गरज आहे. या रस्त्यामुळे उरवडे
एमआयडीसीत येणाऱ्या कंपनी कामगारांचे व नागरिकांचे प्रवास करताना प्रचंड हाल होत
आहेत. त्याकडे लक्ष देऊन हा रस्ता करावा.
पिरंगुट पुलाचे काम संथ गतीने, ठेकेदाराकडून पैशांची अशीही बचत
पिरंगुट पूल
करताना ठेकेदाराने स्वतःच्या खिशाची मस्त काळजी घेतलेली दिसत आहे. पूल बांधून
होईपर्यंत तात्पुरता का होईना, पण सशक्त पर्यायी
रस्ता देणे हे प्रशासनाचे आणि ठेकेदाराचे काम असताना येथे केलेल्या तात्पुरत्या
वळण मार्गावर खड्डेच-खड्डे असून त्यावर दुरुस्ती न करता पैसे मात्र वाचवले जात
आहेत. अनेक वाहनांचे तसेच प्रवाशांची हाडं त्यामुळे खिळखिळी होण्याचे प्रकार घडत
आहेत. तरीही मुळशीकर नागरिक शांत व सौम्य असल्याने ठेकेदाराचे व त्याला पाठीशी
घालणारांचे चांगलेच फावले आहे.
तसेच पुलाच्या
दोन्ही बाजू लवकर करून घेण्याची गरज असताना हे काम मात्र अतिशय संथ गतीने चालू
असून लवकर पूल न झाल्यास पावसाळ्यात तात्पुरता पूल वाहून जाऊन संपर्क तुटू शकतो व
मोठा अनर्थ होऊ शकतो. त्यामुळे तातडीने तसेच दर्जेदार असे काम पुलाच्या दोन्ही
बाजूने होणे गरजेचे आहे.
घोटवडे फाट्यावर होतायत लाड, मुळशीचा मुख्य चौक समस्यांच्या विळख्यात
मुळशीचा मुख्य
चौक असलेल्या घोटवडे फाट्यावर सतत वाहतूक कोंडी होत असते. अगदी दुपार असो की
संध्याकाळ सातत्याने वाहतूक कोंडीने घोटवडे फाटा नकोसा झाला आहे. येथे मात्र
प्रशासनाकडून का कोणास ठाऊक पण लाड चालू आहेत. अतिक्रमण येथे नावालाच काढली गेली
आहेत. पीएमआरडीने घोटवडे फाटा, पिरंगुट, भुगाव, भुकूम येथे
तोंडदेखले अतिक्रमणे काढून दुजाभाव केला आहे. त्यांच्यावर कोणाचा दबाव आहे हे
समजेना. या अधिकाऱ्यांवर तातडीने कर्तव्यात कसूर केल्याची कारवाई करावी. घोटवडे
फाटा येथील अतिक्रमणे काढून हा चौक मोठा प्रशस्त व लगेच त्यावर रस्ते करून मोकळा
करावा.
पुणे-कोलाड
महामार्गावरील दारवली, धनवेवाडी येथील
रस्ता स्थानिक भूधारक कोर्टात गेल्याने रखडला आहे. येथे सारखेच भयंकर अपघात होत
असून काही जणांचा मृत्यूदेखील झाला आहे. ही प्रचंड भयानक बाब असून खासदार, आमदार यांनी राज्य शासन तसेच स्थानिक भूधारक
यांच्यात चर्चेने समेट घडवून आणून मध्यस्थीने प्रश्न सोडवला पाहिजे. अन्यथा येथे
मृत्यूचे तांडव होतच राहणार आहे.
चाले पूल बांधकामात अक्षम्य चूक
पौड-कोळवण या
महत्वाच्या मुख्य मार्गावर असलेला चाले पुलाचे बांधकाम नव्याने होत आहे. ३१मे ची
अंतिम मुदत असतानाही हे कामे बऱ्याच अंशी अपूर्ण आहे. ही प्रशासनाची व ठेकदाराची
अक्षम्य चूक असून याबद्दल दोषी असणाऱ्यांना कडक शासन झालेच पाहिजे. नुसता दिखावा
नको आहे तर कारवाई झालेली दिसली पाहिजे. हा पूल युद्धपातळीवर कसा तयार होईल हे
स्थानिक आमदार व खासदार यांनी यासाठी प्रयत्न केला पाहिजे, अन्यथा पावसाळ्यात येत्या काही दिवसात बाह्यवळण
असलेला तात्पुरता पूल पाण्यात बुडून संपर्क तुटणार आहे.
मुळशीसाठी हिटलर
ठरलेल्या रोडवेज सोल्युशनच्या प्रतापामुळे मुळशीकर नागरिक रस्त्यांच्या समस्येतून
काही सुटेना. भरे पॉवर हाऊस येथील वनविभागाच्या जमिनीमुळे रस्ता करण्यात अडचणी
आल्या. त्याला परवानगी उशिरा मिळाली कारण त्यासाठी तसे प्रयत्न केले गेले नाही.
मात्र या परवानगीसाठी खासदार सुप्रिया सुळे यांनीदेखील प्रयत्न केले. पण त्यामुळे
केवळ पॉवर हाऊस समोरचाच रस्ता तेवढा झाला. ठेकेदाराने पूर्ण न करताच अर्धवट सोडून
दिला व पळ काढला.
त्याचा ठेका रद्द
करून त्याला बाहेर काढण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने गेल्या दीड वर्षांपासून
मंत्रालयात पत्र दिल्याचे अधिकारी सांगतात व त्यावर अजून निर्णय न झाल्याने हा
रस्ता तसाच धूळ खात खड्ड्यांच्या साम्राज्यात पडला आहे. आमदार शंकर मांडेकर यांनी
या रस्त्यासाठी मध्यंतरी प्रयत्न केल्याचे ऐकिवात आले, पण रस्ता काही अजून होईना. या गंभीर प्रकाराकडे
लक्ष देऊन अधिकाऱ्यांकडून माहिती घेऊन त्यावर हा रस्ता त्वरित कसा करता येईल, यावर कार्यवाही करण्याची गरज आहे.
आयटीनगरी हिंजवडीत प्रशासनाचे दुर्लक्ष, प्रशासनाची झाडाझडती दर महिन्याला घ्यावी
आयटीनगरी
माण-हिंजवडी व परिसरात अनेक समस्या आहेत. रस्ता, पाणी, वीज, कचरा, ट्रॅफिक या त्या समस्या असून रस्त्यांवर प्रचंड
पाणी साठणे, पावसामुळे रस्त्याचे प्रचंड नुकसान होणे, ट्रॅफिकमुळे प्रवास नकोसा होणे, मेट्रोच्या संथ कामामुळे अनेक समस्या निर्माण
होणे या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. आयटी परिसरासाठी काम करणाऱ्या एमआयडीसी, पीएमआरडीए, ग्रामपंचायत, महानगरपालिका, जिल्हा परिषद या
सर्व संस्थांचा एक दुवा साधने गरजेचे असून त्यासाठी राज्य शासनानेच एक पाऊल
उचलायला हवे. त्यातून विशेष समिती तयार करून आयटी परिसराचा नियोजनबद्ध विकास
करायला हवा.
मुळशी तालुक्याला समस्यांचा विळखा, आढाव्याचा फार्स नको, परिणाम दाखवाच
मुळशी तालुका
राज्य शासनाला अव्वल दर्जाचा महसूल मिळवून देण्यात अग्रेसर असून राज्य शासनाकडून
मुळशीला परतफेड करण्यात तोंडाला पाने पुसल्याचा प्रकार होत आहे. प्रशासनावर
लोकप्रतिनिधींचे वर्चस्व नसून त्यामुळे कारभारात ढिलापणा आलाय. शासन दरबारी
लोकांची हेळसांड होत असून सर्वसामान्य नागरिकांचा आवाज ऐकायला व त्याला मदत आणि
न्याय मिळवून द्यायला कोणच पुढे येत नाही. महसूल, पोलीस, महावितरण, कृषी, पंचायत समिती, मुळशी प्रादेशिक पाणी पुरवठा विभाग, शिक्षण विभाग, आरोग्य विभाग, दुय्यम निबंधक अशा अनेक ठिकाणी सर्वसामान्य
माणूस पिचला आणि पिळला जात आहे. लोकप्रतिनिधी म्हणवून घेणारांनी सर्वसामान्य लोकांचा
आवाज ऐकून त्यांच्या सहाय्यासाठी आवाज उठवावा आणि न्याय मिळवून द्यावा, तर आणि तरच स्वतःला पुढारी म्हणवून घ्यावे अशी
आर्त हाक पिचलेला सर्वसामान्य मुळशीकर देत आहे. दिखावा आणि देखावा करून नुसतं
वर्तमान पत्रात प्रसिद्धीसाठी कार्य करू नये, परिणाम दाखवून
लोकप्रतिनिधी कसा असावा हे दाखवून द्यावे.
या आहेत मुळशीच्या इतर समस्या
अनेकदा
छोट्या-मोठ्या कारणाने बत्ती गुल होत असून महावितरणकडून योग्य ते सहकार्य व
कार्यवाही होत नाही. वाढत्या लोकसंख्येमुळे महावितरणच्या अनेक नव्या उपकेंद्रांची नितांत गरज असून त्यासाठी
तत्पर प्रयत्न व्हावेत. अनेक गावांत छोटे-छोटे साकव पूल धोकादायक झाले आहेत, त्यांना नव्याने बांधण्याची तजवीज केली पाहिजे.
पीएमपीएमल व एसटी बसेसच्या मुबलक व गरजेच्या ठिकाणी सुविधा उपलब्ध व्हाव्यात.
अग्निशामक यंत्रणेचे काम लवकरात लवकर व्हावे. कचरा समस्या मार्गी लागण्यासाठी कचरा
विल्हेवाट प्रकल्प त्वरित करावा. अनेक ठिकाणी रस्ता रुंदीकरण करण्यात यावे, ज्यामुळे ट्रॅफिक समस्या सुटू शकेल. भुगाव
बाह्यवळण मार्ग लवकर करावा. मुळशी प्रादेशिक व जलजीवन मिशनचे पाणी सर्वांना लवकर
मिळावे. आरोग्यासाठी एक सुसज्ज शासकीय रुग्णालय ससून रुग्णालयाच्या धर्तीवर
व्हावे. पीएमआरडीएचे संपर्क कार्यालय मुळशीत व्हावे. रिक्त शासकीय कर्मचारी जागा
त्वरित भरण्यात याव्यात.
...............................................................................................................................................
(अधिकृत आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'हिंजवडी टाईम्स'च्या फेसबुक पेजला लाईक करा.)
तसेच आमच्या Whats app ग्रुपमध्ये समाविष्ट होण्यासाठी खालील लिंकला click करा.